Tuesday, 17 December 2019

अडक-साखळी

लग्न... लग्न म्हणजे नक्की काय हा प्रश्न मला कायमच पडत राहिला. खूप ढुंढाळलं मी आत आणि बाहेरही. अगदी हळुवारपणे एकेक पदर उलगडून नक्की काय आहे याच्या अंतरंगात हे शोधण्याचाही प्रयत्न केला. पण अंतरंगात सापडली एक पोकळी. आणि बाहेर... तिथे तर त्या पोकळीपेक्षा विदारक दृश्य होतं. एका खूप छान वेष्टनात केवळ काही भग्न अवशेष होते त्या पोकळीचेच.

माझं उत्तर मला फार कष्टाने मिळालं होतं. या ब्रह्माण्डाने तशी रचना केली होती कारण. मी त्याच्याकडे कुठला प्रश्न फेकलाय आणि त्याने उत्तर दिलं नाही असं कधीच झालं नाही.

माझं लग्न ठरलं. माझ्या रूढीवादी कुटुंबियांना ते जुन्या प्रथा-परंपरांप्रमाणे व्हावं असं वाटत होतं. माझा रुढिवादाला विरोध नव्हता पण त्यामागे दृढ असलेल्या आंधळेपणाला होता. त्या साऱ्या भावनांचं प्रदर्शन मांडून त्याचा बाजार होण्याला होता. पण मला पदोपदी अगदी माझ्या मानसोपचार तज्ञ सहकाऱ्यांनीदेखील असंच सांगितलं कि मी हे माझ्या आई-वडिलांसाठी करावं. मला या सगळ्याचा फार फार त्रास होऊ लागला. मग मी मलाच गुंडाळून स्वतःचं एक बोचकं केलं. आणि ते बोचकं ठेऊन दिलं वळचणीला. म्हटलं लागेल तेव्हा उघडू परत. पण या सगळ्यात मला जागाच नव्हती. मी माझ्या संघर्षाने केवळ स्वतःला बांधून घेण्यासाठी कोणता खांब असावा याबाबतीत मत असण्याची जागा निर्माण करू शकले होते. बास. पुढे कुठेच मी नव्हते. गंमत म्हणजे कोणालाच याची काहीच पर्वा नव्हती. "तुला हे करायचंय का?" असा प्रश्न एकदाही मला विचारला गेला नाही. आणि कुठलेही वाद नकोत म्हणून कधी "मम" तर कधी "इदं न मम" असं म्हणत मी स्वतःची आहुती देत गेले. अगदी हसत. याने मी काय साधलं? खूप जणांचं सुख, बोचकंभर दुःख आणि... आणि खूप बोचरं ज्ञान. लग्न म्हणजे काय याचं. सगळ्या विधींमध्ये लग्न किंवा विवाहाची व्याख्या "धर्मसंमत प्रजोत्पादन" अशी केलेली होती. आणि मला समजलेला लग्नाचा अर्थ असा कि लग्न हि समाजाने स्वतःची केलेली सोय.

मला वाटायचं कि नातं कधी सुरु व्हावं आणि कधी संपावं हे ठरवता येत नाही. माझं मत अजून लग्न झाल्यानंतर देखील तसूभरही बदललेलं नाही. कुठल्याही विधी आणि परंपरा नातं निर्माण करू शकत नाहीत किंवा मोडू शकत नाहीत. नातं हे एक व्यसन आहे. ते निर्माण मेंदूमध्ये स्रवण्याऱ्या रसायनामुळे होतं आणि अगदी व्यसनमुक्तीसारखं विविध प्रकारे ते संपतं. एखाद्या वास्तूकडून किंवा माणसाकडून आपल्याला छान वाटतंय असं मेंदूला कळलं कि नातं निर्माण होतं. हे बरं वाटणं बंद झालं कायमचं कि नातं संपतं. जोपर्यंत अधूनमधून का होईना हे बरं वाटणं चालू असतं तोपर्यंत नातं संपू शकत नाही. मेंदूला फक्त बरं वाटणं आणि तितकंसं बरं न वाटणं कळतं. त्याला ते माणसामुळे वाटतंय कि वस्तूमुळे याने फरक पडत नाही.

यापलीकडे काही निर्माण करायचं असेल तर आत्मिक संबंध निर्माण व्हायला हवेत. ते निर्माण होणं सोपं नाही. त्यासाठी आपण समोरच्याला आपल्याला हवाय त्यापेक्षा थोडा जास्तंच आदर दाखवायला हवा. हे आपल्याला जमतंच असं नाही. मग नाती "सवय" आणि "व्यसन" यांच्या व्याख्येत अडकून पडतात. त्यापुढे जायचं कि नाही हि तुमची इच्छा असते.

महत्वाचं हे कि याची कोणालाही काहीही पडलेली नसते. तुमचं काहीही होवो. तुमचं लग्न झालंय म्हणजे बस... त्यापुढे फारतर मुलासाठी पाठपुरावा करणं यापलीकडे समाजाला तुमच्यात काहीही रस नसतो. जसा तो त्यांना तुम्ही लग्नाच्या वयाचे होईपर्यंत नसतो.

आमचा फ्रॉइड म्हणतो तसं समाज हा लैंगिकता आणि हिंसा यांना नेहमीच दाबून ठेवतो. या मानवाच्या सगळ्यात सहज भावना आहेत. त्यामुळे त्यांना दाबून ठेवल्याने माणसाला त्रास होतो. शेवटी मनुष्यप्राणी हादेखील एक प्राणीच आहे. त्यामुळे संधी मिळताच तो आपले खरे गुण दाखवतो. जगभर होणारी युद्ध आणि दंगली हा मनुष्याच्या हिंसक प्रवृत्तीचा दृश्य नमुनाच नाही का? लैंगिकतेला व्यक्त व्हायला लग्नाइतकी उघड संधी कधी मिळणार. कोण कोणासोबत लैंगिक संबंध ठेवतंय याची लग्नापेक्षा सहजतेने हिशोब ठेवणारी दुसरी कुठली व्यवस्था आहे का अस्तित्वात? आणि लग्नसंस्था नसती तर विवाहबाह्य संबंध या शब्दांना तरी काही अर्थ उरला असता का? आणि कौमार्य हि संकल्पना तरी कुठून आली असती? आत्ता प्रचलित पुरुषप्रधान संस्कृती, स्त्री म्हणजे निव्वळ एक वस्तू आणि दबलेली हिंसा आणि लैंगिकता यातूनच नाही का हे सगळं निर्माण होत??
समाज हा स्खलनशील आहे. हेच एकमेव सत्य यातून व्यक्त होतं. सभ्यतेच्या आणि मर्यादाशीलतेच्या नावाखाली दाबून ठेवलेल्या हिंसा आणि लैंगिकतेला व्यक्त करण्यासाठी त्याला कितीही छोटीशी संधी पुरेशी होते.       
याउपर लग्नात संपत्तीचं प्रदर्शन करण्याची आयती संधी मिळते. जितकं मोठं लग्न तितकी मोठी (श्रीमंत) माणसं!! मला प्रश्न पडतो "श्री" म्हणजे "लक्ष्मी" या देवीच्या प्रतिमेविषयी. जी केवळ कष्टातून पाझरते ती अशा प्रदर्शनाला हसणार नाही का? म्हणूनच कदाचित मी देवाला अशा प्रतिमांमध्ये बांधण्यापेक्षा त्याला ब्रह्माण्डात सगळीकडेच पाहते. किंवा मला वाटणाऱ्या स्वातंत्राबद्दलच्या आपुलकीमुळे मी देवालाही कशात बांधू इच्छित नाही. मी चूक असेन किंवा बरोबर, ते महत्वाचं नाहीच आहे. महत्वाची आहे ती हि अडक-साखळी.

समाज माध्यमांवर मध्यंतरी एक चित्र पाहिलं. एक हत्ती आणि त्याच्या गळ्यात चांगली जाड दोरी. ती बांधलेली असते एक प्लॅस्टिकच्या खुर्चीला. खाली लिहिलेलं कि लहान असताना हत्तीला बांधून ठेवलं जातं जाड लोखंडी खांबाला. तो खांब छोटा हत्ती तोडू शकत नाही. मग मोठं झाल्यावर तो दोरी तोडण्याचा प्रयत्नच करत नाही. मला समाज हा अशीच एक अडक-साखळी वाटतो. लहानपणी ती झुगारता येत नाही म्हणून मोठेपणी तिच्याशी झगडणंच बंद करतो आपण! काय हे दुर्दैव!!!

मला वाटतं काही हत्तींच्या आयुष्यात अपघाताने का होईना एक क्षण येत असेल ना... जेव्हा त्यांना अचानक कळत असेल कि आपल्याला सहज सुटता येईल. त्यापैकी काहींना हे खोटं किंवा भास वाटू शकेल. काहींना सवयीची चौकट मोडू नये असं वाटेल. काहींना निव्वळ भीती. पण काही हत्ती तरी पळून जातंच असतील. बंधन झुगारून. स्वत्वाच्या शोधात.

यापैकी आपण कोण व्हायचं हा "ज्याचा त्याचा प्रश्न" आणि त्या क्षणाचं धैर्य!!!